बाबाजी चैतन्य महाराज पालखीचे १४ जूनला होणार प्रस्थान   

ओतूर, (वार्ताहर): जगदगुरु संत तुकाराम महाराज यांचे सदगुरु बाबाजी चैतन्य महाराज पायी पालखी सोहळ्याचे प्रस्थान श्री क्षेत्र ओतूर येथून  १४ जून रोजी होणार आहे, अशी माहिती पालखी सोहळ्याचे सचिव अनिलशेठ तांबे, अध्यक्ष आत्माराम गाढवे, व्यवस्थापक शांताराम महाराज वाकर यांनी दिली आहे.
     
चैतन्य महाराज पंढरपूर पायी वारी पालखी सोहळ्याचे हे ६५ वे वर्ष आहे. १५ जून रोजी पंढरपूरकडे प्रयाण होणार असून २ जुलै रोजी पालखी सोहळ्याचा प्रवेश श्री क्षेत्र पंढरपूर मध्ये होणार आहे. ओतूर येथे नुकताच संत तुकाराम महाराज यांचा भव्यदिव्य त्रिशतकोत्तर वैकुंठगमन सप्ताह सांगता सोहळा पार पडला आहे. त्यामुळे यावर्षी पायी वारीसाठी भाविकांची संख्येत वाढ होणार असल्याची माहिती हभप शांताराम महाराज वाकर यांनी दिली आहे.
      
बाबाजी चैतन्य महाराज यांचा पालखी सोहळा पारनेर, श्रीगोंदा, सिध्दटेक, टेंभुर्णी, आष्टी मार्गे पंढरपूरला जाणार आहे. तर परतीचा प्रवास नातेपुते, फलटण, लोणंद, सासवड, आळंदी ते ओतूर असा होणार आहे. जाताना प्रवास १९ दिवस, तर येतानाचा प्रवास १६ दिवसांचा असणार आहे. बाबाजी चैतन्य महाराज पालखी सोहळ्याच्या मुक्कामासाठी पंढरपूर येथे बोराटे मळ्यात स्वमालकीची १५ गुंठे जागा घेतली असल्याची माहिती पालखी सोहळ्याचे सचिव अनिलशेठ तांबे यांनी दिली आहे. सदर जागेत भाविकांसाठी सर्व सुखसोई उपलब्ध करून देण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे यावे असे आवाहन करण्यात येत आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. जेवढे संतांचे कार्य महाराष्ट्रात आहे, तेवढे देशात इतरत्र आढळून येत नाही. भागवत धर्माची आणि वारकरी संप्रदायाची ही भूमी असून श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी वारीचे आगळेवेगळे महत्त्व आहे.
 
 नुकत्याच पार पडलेल्या त्रिशतकोत्तर वैकुंठगमन सप्ताह सोहळ्यास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराज पालखीचा सन्मान पंढरपूर येथे गाभार्‍यात प्रवेश देऊन करण्यात यावा, अशी मागणी ओतूरकर ग्रामस्थांनी केली आहे.
- अनिल तांबे, अध्यक्ष,  कपर्दिकेश्वर देवधर्म ट्रस्ट, ओतूर.

Related Articles